रविवार, ३१ मे, २०२०

                               राज्यातील तंबाखु मुक्ती केंद्रातून साडेपाच लाख रुग्णांवर उपचार
                                    जागतिक तंबाखु विरोधी दिनी’ आरोग्यमंत्र्यांनी घेतली
                                                
                                                महाराष्ट्र तंबाखु मुक्त करण्याची शपथ



मुंबई,ब्युरोचीफ दि.३१:- जागतिक तंबाखु विरोधी दिनानिमित्त आज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील जनतेला तंबाखु मुक्तीची शपथ देतानाच महाराष्ट्र तंबाखु मुक्त करण्याची शपथही घेतली. राज्यात असलेल्या २२४ तंबाखु मुक्ती केंद्रांच्या माध्यमातून सुमारे साडेपाच लाख रुग्णांवर उपचार करण्यात आल्याची माहितीही आरोग्यमंत्र्यांनी दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि जागतिक तंबाखु विरोधी दिनाच्या दोन दिवस आधी राज्य शासनाने सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान प्रतिबंध आणि थुंकण्यास बंदी आदेश लागू केल्याचेही त्यांनी सांगितले.
दरवर्षी ३१ मे रोजी जागतिक तंबाखु विरोधी दिन साजरा केला जातो. त्यानिमित्त जागतिक आरोग्य संघटनेमार्फत घोषवाक्यही दिले जाते. ‘तरुणांना तंबाखु उद्योगांच्या तावडीतून वाचवा आणि त्यांना तंबाखु व निकोटीनच्या वापरापासून दूर ठेवा’ असे घोषवाक्य यावर्षासाठी देण्यात आले आहे.यासंदर्भात अधिक माहिती देतांना आरोग्यमंत्री म्हणाले, महाराष्ट्रात २६ हजार ४१८ शाळा आणि २४४२ आरोग्य संस्था तंबाखु मुक्त करण्यात आल्या आहेत. तंबाखु नियंत्रण कायद्यांतर्गत सुमारे ६ कोटी ५४ लाख २४ हजार ४३० इतका दंड वसुल करण्यात आला आहे. २२४ तंबाखु मुक्ती केंद्राच्या माध्यमातून ५ लाख ४१ हजार ४१५ रुग्णांवर उपचार करण्यात आले असून २५ हजार २७५ जण तंबाखु मुक्त करण्यात आले आहेत. जुलै २०१८ पासून राज्यात हुक्का बंदी देखील करण्यात आली आहे. गेली चार वर्ष राज्यामध्ये मौखिक कर्करोग तपासणी शिबीरे देखील घेण्यात आली आहेत.

आज येथील शासकीय निवासस्थानी आरोग्यमंत्र्यांनी तंबाखु विरोधी शपथ देताना...मी, माझे कार्यालय, माझे घर, माझे गाव, माझी शाळा, माझी संस्था आणि माझे महाराष्ट्र राज्य तंबाखु मुक्त करण्याचा प्रयत्न करेन अशी शपथही घेतली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...