मंगळवार, २३ जून, २०२०


               "जगावं आईच्या अस्तित्वासाठी"

मी बालाजी हौसाजी किरवले
  पोलीस उप निरीक्षक

माझा जीवन प्रवास - हा एक धगधगता जीवन प्रवास आहे. मला सार्थ अभिमान आहे माझ्या आई-बाबांचा. माझे आई बाबा हिंगोली जिल्ह्यातील खापरखेडा या गावाचे रहिवासी. पोटाची खळगी भरण्यासाठी मोलमजुरी करण्यासाठी वाकोडी या गावात स्थायिक झाले.

वाकोडी हे डोंगराच्या कुशीत वसलेलं. जवळच ईसापुर धरण. निसर्गरम्य वातावरण. नद्या नाल्यांना पाण्याचा सुकाळ.माझा जन्म वाकोडी या गावात झाला. ईथूनच सुरू होतो माझ्या जीवनाचा प्रवास. आई - बाबा  अडाणी. आम्ही पाच बहिण भाऊ. मी सर्वात लहान. आम्ही तुटक्या मुटक्या झोपडीत राहत होतो. आई बाबा दिवस भर दोघे ही लोकांच्या शेतात मजुरी काम करायचे. ज्या दिवशी काम लागेल त्या दिवशी पोटभर जेवण भेटायचे. आम्ही खाणारे पाच बहिण भाऊ. आम्ही उपाशी झोपू नये म्हणून आई बाबा काबाड कष्ट करायचे. गावातील बलाढ्य  लोकांच्या शेतात मजुरीने काम करत राब राब राबायचे. आमच्या पोटाची खळगी भरायचे. ज्या दिवशी काम नसेल त्या दिवशी चिंतेने विचार करत बसायचे. आज पोरं उपाशी झोपणार नाही याची कटाक्षाने काळजी घ्यायचे. माझे भाऊ बहीण देखील घरचे काम करण्यास मदत करायचे. गरिबीने भावा बहिणीला शिक्षणापासून वंचित ठेवले. मला बालपणापासून शिक्षणाची गोडी होती. विठ्ठलराव शिंदे गुरुजींच्या कृपेने  मला वाकोडी या गावात जिल्हा परिषद शाळेमध्ये पहिली वर्गात प्रवेश मिळाला. एक झो-या. त्यात खापराची पाटी. फाटकेच पँट शर्ट, बेल्टच्या जागी कर्दोडा गुंडाळलेला. मी पहीली ते पाचवी जिल्हापरिषद शाळा वाकोडी येथे शिकलो. तिसरी, चौथी, पाचवीत प्रथम क्रमांक मिळविला म्हणून नावारूपाला आलो होतो. गावात झालेल्या "एकच प्याला" या नाटकात बालकाची भूमिका बजावली म्हणून गावकऱ्यांनी माझं कौतुक केलं. तेव्हा  पासून  गावातील लोक मला "हौसाजी आंधाचं पोरगंʺ म्हणून ओळखू लागले. (मी आंध समाजातील असल्यामुळे) आई बाबाची खूप ईच्छा होती की मी  खूप शिकावं, मोठं व्हावं, साहेब व्हावं. माझ्या शिक्षणासाठी आई बाबानी खूप  काबाड कष्ट केले. माझ्या आई बाबांच्या हाता-पायाला काम करुन जख्मा व्हायच्या. मला त्यांना बघून रडू यायचं की का हा भोग नशिबी आला. गरिबी, दारीद्र्य काय असतं ते मीच समजू शकतो...


एक प्रसंग आठवतो-- मी लहान असतांना घरा मध्ये चिमूट भर पीठ नव्हतं. आई चिंतेत बसली. मी विचारलं, "आई, आज आपण उपाशी झोपणार का ग..." आई म्हणाली, "नाही रे बाळा. आपल्याला सरपंचाने त्यांचे येथील लग्नातील उरलेल्या भाकरी दिल्या होत्या. त्या मी वाळू घातल्या आहेत. त्याचे  कुटके करून खाऊ." आई मनातल्या मनात रडत होती. मी तीचे केवीलवाणे डोळे फक्त बघत होतो. मी तिचा चेहरा वाचला होता. तिच्या चेह-यावरील भाव मला सर्व काही सांगुन गेले... असे मी अनेक प्रसंग पाहिले. मी निश्चय केला की काही झाले तरी मी शिकणार, मोठा होणार, नोकरी करणार. माझ्या आई बाबाचे स्वप्न पूर्ण करणार. आमच्या घरी लाईट नव्हती. मी चिमणीच्या अंधुक उजेडात अभ्यास करायचो. माझे आठवड्यातील कामाचे दोन दिवस पक्के ठरलेले होते. प्रत्येक शनिवारी शाळेला दांडी  मारून शनिवार व रविवार मी आई सोबत लोकांचे शेतात कधी निंदन काम तर कधी कापूस वेचन्यासाठी जायचो. माझ्या हिश्याचं काम आईच करायची. आई दोन्ही दोन्ही हताने कापूस वेचायची. 
मी  शक्य तेवढा हातभार लावायचो--बाकी सर्व काम आईच्या माथी असायचं. पण कंटाळा हा शब्द ओठी नव्हता.
मी ईयत्ता पाचवी प्रथम क्रमांकाने पास झालो. पुढचे शिक्षण घेण्यासाठी घरची आर्थिक परिस्थिती बिकटच होती. तेव्हा एक मसीहा माझ्या जीवनात आला. ते आमचे गोविंदराव नाईक गुरुजी. त्यांनी माझी नवोदय परीक्षेचा फाॅर्म भरला. नवोदयचं पुस्तक घेऊन दिलं. नवोदय परीक्षा पास झालो. वाकोडी गावात अजुनच नावा रुपाला आलो. गुरुवर्यांनी व गावातील समजदार लोकांनी कौतुकाची थाप दिली. कारण नवोदय परीक्षा पास होणारा जि.प. वाकोडीच्या इतिहासातील मी पहीला विद्यार्थी होतो. खंडाळे सरांनी वसमतला जाण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन करुन प्रवासासाठी आर्थिक मदत केली. मला पुढील शिक्षणासाठी वसमत नवोदय विद्यालयात ईयत्ता सहावीत प्रवेश मिळाला. पण मन मात्र तिथं रमत नव्हते. आई बाबाची आठवण सारखी भेडसावत असे. माझ्या सारखे आई बाबांच्या आठवणीत गहीवरलेले जवळपास सगळेच विद्यार्थी असावेत. स्वत:च्या भाकरीचा प्रश्न तात्पुरता मिटला होता.
सहावी ते दहावीपर्यंत नवोदय विद्यालय वसमत येथे शिकलो. तेथे खुप छान छान अनुभव आले.  रनिंग व कबड्डी हे ईवेंट दोन वेळेस राष्ट्रीय स्तरावर खेळलो. सिल्व्हर मेडल प्राप्त केले. दहावी पास झालो. आई बाबा म्हणायचे तू शिक्षण कर. आम्ही वाटेल ते करू. शिक्षणासाठी आई बाबानी रात्रंदिवस एक करून मजुरी केली. उपाशी राहून मला शिक्षणासाठी खर्च पुरविला. मी अकरावी  बारावीचे शिक्षण लातूर नवोदय विद्यालयात पुर्ण केलं.
       नवोदय विद्यालय लातूर  मधील एक प्रसंग आठवतो. ती घटना अविस्मरणीय ठरली.
*माझी अकरावीची वार्षिक परीक्षा नुकतीच संपली होती.  उन्हाळी सुट्टया लागणार होत्या.  माझे वर्ग मित्र व सर्व  विद्यार्थी आपापल्या घरी जाण्यासाठी उत्साही होते. आनंदात व खुश होते. मी मात्र रात्रभर झोपलो नाही. अनेक विचार, असंख्य प्रश्न मनामध्ये वादळ निर्माण करत होते. मी घरी,गावी जाऊन काय करू...!? लातूर ला राहिलो तर इथेच मजुरी किंवा ईतर काहीही काम करता येईल. थोडे पैसे घरी देता येतील ह्या विचारात मी  रात्रभर विचार करत राहिलो. दुसऱ्या दिवशी मी कामाच्या शोधात बाहेर पडलो. अचानक माझ्या लक्षात आलं की नवोदय विद्यालयाचे ईमारतीचे बांधकाम सुरू आहे. जर आपल्याला इथेच काम मिळाले तर... राहण्याची व्यवस्था इथेच होईल. मी धाडस करून काँट्रॅक्टरकडे गेलो. विचारलं, "काका, मी ईथेच शिकतो. सुट्ट्या लागल्यात पण मी गावी जाणार नाही". थोडक्यात त्याला परीस्थिची जाणीव करुन दिली.  "मला इथं मजुरी काम मिळेल का?... कोणतंही काम करण्याची माझी तयारी आहे,,,तुम्ही सांगाल ते..." काँट्रॅक्टरने सांगितले प्रिंसीपल सरांना विचार. मी  प्रिंसीपल सरांना थोडक्यात हकीकत सांगीतली. प्रिंसीपल सरांनी माझ्याकडं बघीतलं. क्षणभर विचार केला. स्मितहास्य करुन मान हलवली. त्यांनी लगेच होकार दिला. राहण्यासाठी जुन्या बिल्डींगची एक खोली दिली. परत एक प्रश्न होता... जेवणाची व्यवस्था कशी करणार...!? पी.टी.टीचर वरघट सरांनी मला थोडी भांडी, स्टोव्ह दिला. मी दिवस भर काम  करून एक वेळ भाकरी करुण खात होतो. ते सर्व ठीक आहे. खरी गंमत तर आता आहे. ज्या ठिकाणी मी कामाला होतो, त्या ठिकाणापासुन काही अंतरावर एक मारोती मंदीर व मंगल कार्यालय होते. त्या ठिकाणी लग्न लागायचे. ज्या दिवशी त्या ठिकाणी लग्न असेल त्या दिवशी मी खूप खूष व्हायचो. कारण त्या मी जेवनाच्या पंगतीत आवर्जुन हजर असायचो. मग पोटभर जेवण करायचो आणि आजच्या मजुरीतून पूर्ण पैसे घरी देता येतील ह्या आशेने खुप खुश असायचो. मी दोन महीने मजूरी काम केलं. प्रिंसीपल सरांना भेटलो. घरी जाण्यासाठी सरांचा निरोप घेतला. दोन महिन्या नंतर घरी जातांना माझा आंनद गगनात मावेनासा झाला. मी घरी गेलो. आईच्या गळ्यात पडलो. आईच्या हातात मजूरी चे पैसे दिले. आई स्तब्ध... आईच्या डोळ्यातुन आनंदाश्रु येत होते... प्रत्येक पाऊल आम्हाला दुःखाचा सामना करावा लागतो याची तीला खंत होती. म्हणुन ती माझ्याकडुन खुप मोठ्या आशेवर होती. मी जे दिवस बघते, ते दिवस माझ्या मुलाच्या वाट्याला येऊ नयेत म्हणुन ती माझ्यासाठी, माझ्या शिक्षणासाठी वाटेल ते करण्यास तयार होती.*
      पुढील सत्र सुरु झाले. नवोदय विद्यालय लातुर येथे प्रवेश केला. तेथे शिक्षकवृंद खुप प्रेमळ होते.  वरघट सरांच्या सानिद्यात राहीलो. त्या दरम्यान रनिंग ईवेंट मध्ये राष्ट्रीय स्तरावर खेळलो. बारावीचं शिक्षण पुर्ण केलं. आज पर्यंत नवोदयनं मला खुप दिलं. जड अंतकरणानं नवोदयचा निरोप घेतला. जे मी सहावी ते बारावी पर्यंत जीवन जगलो ते बालपण, ते शिक्षकवृंद, तो मित्र परीवार, तो आनंद ईथपर्यंत ठीक होतं. पण यापुढं काय! पुढील शिक्षण कसं करायचं...? आई बाबाना किती दिवस कष्ट करू द्यायचे..!
        मी बारावी नंतर पुढील शिक्षण व नोकरीच्या शोधात औरंगाबाद मध्ये राहू लागलो. पुन्हा एक प्रसंग घडला. मी उपाशी पोटी पाणी पिऊन कामाला लागलो. भूक पिच्छा सोडत नव्हती. माझ्याकडे एक रुपया होता. त्या एक रुपयात मी दोन केळी विकत घेतली. दोन केळीत भूक भागणार नाही याची मला जाणीव होती. मी ते दोन केळी सालटा सहित खाल्ली. पुन्हा कामाला लागलो. काम करत कुठं नोकरी मिळेल का...याच विचारात औरंगाबाद येथे नाईक काॅलेजला B.A.ला Admission घेतलं. सकाळी काॅलेज आणि नंतर काम दोन्ही चालु असतानाच जिंदगीतल्या संकटांनी पुन्हा एकदा परीक्षा घेतली. ज्या बाबांनी जिवाचं रान केलं, माझ्यासाठी अनेक स्वप्न बघितली, काळाने असा घाव घातला की माझ्या बाबाची प्राणज्योत मावळली. मी पूर्ण पणे खचलो. आईने धीर दिला. एक पेपरला जाहिरात वाचली. पोलीस भरतीसाठी जागा निघाली. जबाबदारी वाढलेली होती. एकीकडे बाबा नुकतेच गेल्याचं दुःख. दूसरीकडे भरतीची तयारी. मी सावरलो. भरतीसाठी जायला पैसे नव्हते. परत एकदा संकट दाराशी उभं राहिलं. पोलीसात भरतीसाठी प्रवास करणं म्हणजे समोर अथांग सागर दिसत होता. जायचं कसं काही सुचत नव्हतं. आईने माझ्या चेह-यावरील भाव ओळखले. ती हजर जवाबी होती. आईने तिच्या गळ्यातील मंगळसूत्र काढुन मला म्हणाली, "हे घे. हे मोड. ते पैसे घेऊन भरतीला जा. पायाखालची जमीन घसरली. मी मंगळसूत्र बाजारात मोडलं. आईचा आशीर्वाद घेतला. चरण स्पर्श केले. घरुन निघालो. पुन्हा एकदा आईकडं वळुन बघीतलं. तीला डोळे भरुन बघीतलं. तीच्या मनातील भाव मी ओळखले. आज ती खुप खुप खुष होती. तीचा माझ्यावरील विश्वास कायम होता. मी पुन्हा एकदा मागे वळुन बघीतलं. हात हालवुन टाटा केला. तीनेही टाटा केला. तीने हात हालवले. जणु ते हात म्हणत होते की आता मागे वळु नकोस. पुढं जा. आणि पुढच जात रहा.  छाती भरुन आली. मन दाटुन आलं. मनानं ठाम निश्चय केला. पुन्हा मात्र मी मागे फिरुन पाहीले नाही. 'भरती झालो तरच तोंड दाखविन...' असे काही काही मनात विचार आले. आई बाबाचा आशीर्वाद पाठीशी होता. भरतीसाठी गेलो. ईतरांनी दोन दोन डझन केळी खाल्ली होती. गाडीभर साल्टं जमा झाले होते. आईनं मला भाकरी, हिरव्या मिरच्याचा ठेचा आणि आंब्याचं लाणचं पालवात बांधुन दिलं होतं. ते मी तीन दिवस खाऊ शकलो होतो. मी पोटभर जेवलो. आई बाबाचा चेहरा समोर ठेवुन भरतीत उतरलो. आईचे मला पुढं ढकलत असलेले हात हारण्यास नकार देत होते. ते मला प्रेरणा देत होते--मागे वळु नकोस. पुढं जा आणि पुढच जात रहा. आई बाबाचा आशीर्वाद - मी पहिल्याच प्रयत्नात आणि सहजरित्या भरती झालो. नवोदय आणि नवोदय मधील त्या माय बाप गुरुवर्यांची खुप आठवण आली. कारण नवोदय मधील अथक परीश्रमाने मिळवलेले राष्ट्रीय स्तरावरील द्वीतीय क्रमांकाचे प्रमाणपत्राने माझा मेरीटचा ऊचांक गाठला होता. घरी आलो. आईला आनंदाची बातमी दिली. आई खूप खुष झाली. ड्युटीवर जाॅईन  होण्याची ऑर्डर मिळाली. मग मी खुप रडलो. आई पण खुप रडली. कारण माझा आनंद बघण्यासाठी बाबा नव्हते न...!!!
         मी ट्रेनिंगला गेलो. 
ट्रेनिंग दरम्यान मी गावी आलो होतो - आईला भेटायला... माझा पहीला पगार झाला होता. पहिल्या पगारातच मी आईला सोन्याची पोत करून दिली. हा आनंद माझ्यासाठी माझ्या जीवनातील सर्वात मोठ्ठा आनंद होता. 'आता तु लोकांच्या कामाला जायचं नाही...' मी स्मितहास्य करुन आईला बजाऊन सांगीतलं.
      मी ट्रेनिंग दरम्यान बंदोबस्तसाठी नाशिक या ठिकाणी आलो.एक दिवस अचानक मित्राचा फोन आला. "बाला, आईची तबेत बिघडली. आई तुझी आठवण करत आहे." कशी बशी रजा मिळाली. रजा घेऊन गावी आलो. आई बाजे वरती पडलेली. गावातच माझा मित्र होता-डाॅ.मनाठकर. लगेच मनाठकर डॉक्टरला घरी बोलावलं. डॉक्टरांनी आईची तपासणी केली. ते म्हणाले, 'वेळ खुप कमी आहे.' डाॅक्टरांनी आईला बाजेवरुन ऊचलुन जमिनीवर झोपवलं. मी आईचं डोकं माडीवर व तीचा हात हातात घेऊन बसलो. "आई, मी तुझा बाला. मी आलोय ग--तुला भेटायला."
निसर्गाला काही वेगळंच मान्य होतं. हळू हळू सर्व ठिक होणार होतं. मी आईला म्हणलो, "आई, आता आपले वाईट दिवस गेलेत. आता तुला काम करायची गरज नाही. आई खुप वृद्ध झाली होती. अचानक बोलता बोलता माझी आई गप्प झाली. आई ग!, ये आई!, आई! उठ! बोलणं माझ्याशी! काही तरी बोल. गप्प राहू नको ग आई! आता आपल्याला शिळ्या भाकरीचे कुटके करून खाण्याची वेळ निघून गेलीय. आपले वाईट दिवस संपले. आई!!!आई!!! आई शांत डोळे मिटून... पण तीचा श्वास चालु होता. माझ्यासाठीच ती जीवंत होती. ती मला सोडुन जाणारच नाही. वेडी आशा  होती मला कि आई डोळे ऊघडेल, उठेल.
वाटलं नव्हतं तिची साथ फक्त इतकीच टिकेल.
तीचं नेमकं काय म्हणनं होतं,,,
मला समजलं नव्हतं...
तिला जाण्याची का घाई झाली,,,
कोडं उमगलं नव्हतं...
तिच्या हातावर जेंव्हा
अश्रु माझे पडले,,,
आईनं चटकन डोळे उघडले...
अन् तीचे ओठ थरथरले---
ती काही तरी पुटपुटली...मला सारं काही कळुन चुकलं होतं...
अजुन काही तरी तीनं बोलावं,
वेडं मन आशेवरच होत...
माझा धरलेला हात तिनं तेंव्हा घट्ट दाबला होता,,,
फसलो ग मी आई,
तो तर तुझा…
शेवटचा निरोप होता...
आई....साता समुद्रापलीकडे निघून गेली होती. माझ्या डोळ्यातून अश्रु धारा वाहू लागल्या. कुणी काळजावर वार केल्यासारखं झालं. माझी आई देखील मला सोडून देवा घरी गेली. नशिबानं थट्टा केली. माझा आधार! माझी हिंमत! माझी ताकत! बघता बघता माझ्या आईची प्राणज्योत मावळली. जणू काही माझ्या आईने माझ्यासाठी मी भरती होईपर्यंत जीव हाताशी  धरून ठेवला होता. माझ्या आईने माझ्या मांडीवर  प्राण सोडला. एवढ्या मोठ्या जगात मी पोरका झालो. आज ही तो क्षण आठवला की जीव कासाविस होतो.
मला माझ्या आईची सेवा करण्याची संधी मिळाली नाही. मला आई बाबा गेलेलं दुःख मोठं होतं. माझ्यापुढं आता फक्त आईबाबाचं स्वप्न होतं. आईच्या स्वप्नासाठी मी पुन्हा एकदा दुःखातून सावरलो. पोलिसाची नोकरी करत मी MPSC ची तयारी केली. मी MPSC पास झालो परंतु मेरिटमध्ये येण्यासाठी मला तीन मार्क कमी पडले. पुन्हा एकदा मला नशिबाशी झटावं लागलं. मी परत MPSC परीक्षा दिली. परंतु मेरिट लिस्टमध्ये येण्यासाठी मला पुन्हा एक मार्क कमी पडला. मी हताश झालो नाही. हिंमत सोडली नाही. जीवनात अनेक दुर्दैवाचे प्रहार सहन केले. मला माझ्या आई बाबाचं स्वप्नं पूर्ण करायचं होतं. मी पुन्हा MPSC ची परीक्षा दिली आणि मेरिट लिस्टमध्ये नाव आलं. मी PSI झालो. एकीकडे आनंद होता तर दूसरीकडे आई बाबाचे स्वप्न पूर्ण झाले हे पाहण्यासाठी आई बाबा नव्हते. त्या दिवशी मी जिंकुन सुध्दा हारलो. देव एवढा निष्ठुर कसा झाला. त्यानं सगळं काही देऊन सगळं काही हिसकावून घेतलं. आज पण असा एक ही दिवस जात नाही आई बाबांच्या आठवणी शिवाय.. मी देव पाहिला नाही पण देवरूपी आई-बाबा पाहिले. ज्यावेळेस मी आई बाबाचा फोटो पाहतो, त्यावेळेस वाटतं की त्यांनी त्या फोटोतून बाहेर यावं आणि मला त्यांच्या छातीशी बिलगुन घ्यावं. आई बघ ना ग,  मी साहेब झालो .......
मला सुखाचे दिवस आले आणि मी आई बाबाना परत आणू शकत नाही. एक निश्चय केला की आईच्या नावानं कोणत्या तरी माध्यमातून गरीब, वृद्ध यांच्यापर्यंत पोचावे. यासाठी एक संस्था असावी. हे स्वप्न मनात होतं. पैशाचं मोल कळालेलं होतं. पोटाची भूक काय असते त्याची जाणीव झालेली होती.
एक दिवस अचानक माझी भेट एक संस्था चालक ज्योती आडेकर मॅडमशी झाली. चर्चेतून विषय निघाला. मी माझे स्वप्न मॅडम समोर मांडले की माझ्या आईच्या नावाने एक फाउंडेशन सुरू करू. त्यांनी लगेच होकार दिला. माझी आई स्व.अंजानी हौसाजी किरवले यांच्या नावाने मागील एक वर्षा पासून "अंजानीआई फाउंडेशन" हे जालना या ठिकाणी कार्यरत आहे. अंजानीआई फाउंडेशनच्या माध्यमातून कोरोना संसर्गामुळे लॉक डाऊन मध्ये अडकलेले लोक, मोल मजुरी करणारे, धूनी भांडी करणारे, हातगाडी ओढणारे, विधवा अनाथ, मूकबधिर, अपंग, शेत मजूर, बिडी कामगार यांना  किराणा किट, भाजी पाला, अन्नधान्य, फुड पॅकेट, तसेच पोलीस, होमगार्ड, सफाई कामगार यांना चहा, नाश्ता, सेनीटायजर, मास्क, फेस शील्ड , विटामिन सी गोळ्या, तसेच रखरखत्या ऊन्हात गावाच्या दिशेने पायी प्रवास करणारे वयोवृद्ध, लहान मुले यांना चप्पल जोड, पायी प्रवास करणारे तरुणांना टी-शर्ट, रुमाल, चप्पल जोड, पाणी बॉटल, बिस्कीट, चिवडा पाकीट, खिचडी, पोळी भाजी,  लहान मुलांना फळं वगैरे गरजेनुसार वाटप करण्यात आले. जवळपास 4000 हजार लोकांची भूक भागविण्याचं काम या ठिकाणी अंजानी आई फाऊंडेशनच्या माध्यमातुन करण्यात आलं. आम्ही भूक मारी सोबत लढलो. आमच्याकडे मदत म्हणुन कुणी पैसे दिले, कुणी गहू दिले, कुणी तांदुळ, दाळ दिले. ते घेऊन आम्ही गरजुपर्यंत पोचलो. मूठभर धान्याने अनेकांच्या घरात चुली पेटल्या. आमचा उद्देश एवढाच होता की कोणी ही उपाशी झोपू नये. उपासमारी, भूक काय असते ते मी जवळून पाहिलंय. स्वत: अनुभवलंय. ज्या वेळेस काही कुटुंबात चूल पेटवण्यासाठी काडी डबी नसायची, घरात पीठ नसायचे, लहान लहान मूलं भुकेने व्याकूळ होऊन आईला जेवन मागायचे त्या वेळेस माझ्या वरील प्रसंग नजरेसमोर यायचे. कोरोनामुळे व लॉक डाऊनमुळे अडकलेले लोकं आपल्या गावी जाण्यासाठी 500 - 500 कि.मी. रखरखत्या ऊन्हात पायी चालत यायचे. त्या वेळेस त्यांना जेवणाचे पाकीट, पाणी द्यायचो. त्या वेळेस त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मन समाधान व्हायचं. आमची अंजानी आई फाऊंडेशनची टीमने लॉक डाऊन काळात रखरखत्या ऊन्हात लगातार दररोज पायी जाणारे लोकांपर्यंत पोहचुन त्यांना जेवन, पाणी दिले. वस्तीत, वाडीत जाऊन कोरोना वायरस बदल जनजागृती केली. किरवले मित्र मंडळींची आर्थिक मदत व सहकार्याने जालना टीमचे विद्या जाधव, अंजानी आई फाउंडेशनची संकल्पना लिहिणारे ज्योती आडेकर व त्यांचे सहकारी यांना सोबत घेऊन लॉक डाऊन दरम्यान कोरोनावर मात करण्यासाठी व गोरगरीबांच्या सेवेसाठी झटत राहीलो. अजूनही काही लोकांचे मदतीसाठी फोन येतात. तेव्हा तात्काळ मदत पोहोचवली जाते. नक्कीच लॉक डाऊन संपेपर्यंत व त्यानंतरही निरंतर गोरगरीब, गरजू लोकांना मदत करू अशी शाश्वती दतो.
बेरोजगार व हालाखीची परिस्थिती असलेल्या तरुण मुलांना योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. येणाऱ्या काळात अंजानीआई फाउंडेशनच्या वतीने जे गरीब मूलं पोलीस भरती/MPSC ची तयारी करत असतील परंतु त्यांची आर्थिक परीस्थिती खुपच हालाखीची आहे अशा तरुणांना पोलीस भरती व MPSC चे मार्गदर्शन व शिक्षणाचा खर्च फाउंडेशन मार्फत  करण्यात येणार आहे. तसेच ज्या घरामध्ये मुलं आई-वडिलांचा सांभाळ करत नसतील अशा वयोवृद्ध आजीबाई, आईंना योग्य तो न्याय देऊन त्यांना महिनेवारी किराणा सामान भरून देण्यात येईल. जे मुलं चुकीच्या मार्गाने घर सोडून पळून आले त्यांना घरी पोचतं करणे, रस्त्यावर भीक मागणारे अशा मुलांना शिक्षणाची आवड निर्माण करून देणे, आई-वडील नसलेल्या मुलांना शिक्षणासाठी दत्तक घेऊन शिक्षणासाठी लागणारा खर्च अंजानीआई फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
मी काही सूर्य कुळातला नाही. मी माझ्या आईचा आहे. माझी आई एक उजेड देणारी पणती आहे......
आई तुझा आशीर्वाद माझ्या पावलांकरिता दिवा व माझ्या मार्गावर प्रकाश आहे....

बालाजी हौसाजी किरवले
   पोलीस उप निरीक्षक
       औरंगाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...