रविवार, ७ जून, २०२०

                        नागपूर खून प्रकरण; प्रकाश आंबेडकरांचा पोलिसांच्या भूमिकेवर आक्षेप,
                                              तपास अधिकारी हटविण्याची मागणी !



नागपूर,ब्युरोचीफ :- नागपूर येथील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते अरविंद बनसोड या होतकरु युवकाचा मृत्यू संशयास्पद असतांना पोलिसांनी या प्रकरणात आत्महत्या म्हणून नोंद करून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पदाधिकारी असलेला आरोपी मिथिलेश उमरकर यास वाचविण्यासाठी हत्येच्या प्रकरणाला राजकीय दबावापोटी आत्महत्येचे स्वरूप देण्यात येत आहे. हे प्रकरण मिटविण्यासाठी राजकीय दबावतंत्राचा वापर करण्यात येत असल्याचा आरोप केला जात  आहे.२७ मे रोजी थडीपवनी येथे अरविंद बनसोड आणि त्याचे दोन सहकारी बँकेत पैसे काढायला गेले होते.  एचपी गॅस एजन्सीचा नंबर हवा म्हणून बनसोड यांचा सहकारी एजन्सीच्या  बोर्डाचा फोटो काढत होता. फोटो काढतांना  'फोटो का काढतो?' म्हणून एजन्सीतील गुंडांनी त्यांचा मोबाईल हिसकावला. मोबाईल घेण्यासाठी अरविंद आत गेला, तर तिथे एजन्सीचा मालक मिथलेश उमरकर बसलेला होता, त्याने अरविंदला जातिवाचक शिवीगाळ आणि जीवेमारण्याची धमकी देत गुंडांसोबत मिळुन मारहाण केली आणि त्याचा मोबाईल हिसकावून घेण्यात आला. अरविंद मोबाईल मागत असताना उमरकर व त्याचे गुंड त्याला मारहाण करीत राहिले, अरविंद बाहेर आला आणि सहकार्यांना येथून जा म्हणाला, त्याचे सहकारी थोडे बाजूला गेले. अरविंद पुन्हा गेला, मोबाईल द्या म्हणाला, त्यांनी यावेळी दोन्हीही मोबाईल घेतले आणि परत अरविंदला मारहाण केली.  अरविंद परतला नाही म्हणून थोड्या वेळाने सहकारी तेथे गेले असता अरविंद गॅस एजन्सीच्या पायरीवर पडलेला दिसून आला. जवळच कीटकनाशकाची बाटली दिसून आली. घटनास्थळी लोक जमा झाले म्हणून आरोपी मिथलेश उमरकरने अरविंदला  गाडीत टाकून दवाखान्यात घेऊन गेले. जाताना कीटकनाशकाची बाटली घेऊन गेले. पुन्हा गाडीत त्याच्यासोबत काय झालं हे कोणालाच माहीत नाही. अशी माहिती अरविंदच्या सहकाऱ्यांनी दिली.


          अरविंद बनसोडने विष पिऊन आत्महत्या केली यावर अरविंदचे सहकारी मित्र व भाऊ यांचा विश्वास नाही. अरविंदची हत्या करण्यात आली असल्याची दाट शक्यता दिसत असतांना पोलसांनी आत्महत्या म्हणून या प्रकरणाची नोंद केली आहे. अरविंद  स्पर्धा परिक्षेची तयारी करत होता आणि सोबतच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेतून गोरगरीब जनतेचे काम करायचा. एक दलित कार्यकर्ता व्यवस्थेला प्रश्न का विचारतो ? या रागातून त्याची सुनियोजित कट करून हत्या करण्यात आली असल्याचा आरोप अरविंदच्या निकटवर्तीयांकडून करण्यात आला आहे.आरोपीचे वडील बंडोपंत उमरकर राष्ट्रवादी काँग्रेसचे नागपूर जिल्हा उपाध्यक्ष आहेत, तर आरोपी राष्ट्रवादीचा युवा नेता पंचायत समिती सदस्य आहे. तसेच आरोपी मिथिलेश उमरकर हा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचा निकटवर्तीय असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे आरोपीस वाचविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर राजकीय दबाव टाकुन प्रकरण मिटविण्याचे प्रयत्न केले जात आहे. या प्रकरणात किरकोळ ३०६, ३४ कलमाअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. ही बाब फार चिंताजनक आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात त्वरित लक्ष घालून  कारवाई करावी. या प्रकरणात वंचित बहुजन आघाडीच्यावतीने एक निवेदन देण्यात आले असून त्यात दिलेल्या मागण्या मान्य करण्यात याव्यात, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीतर्फे करण्यात आली आहे. जातिवाचक शिवीगाळ व सार्वजनिक ठिकाणी अवहेलना करण्याबाबत "अट्रॉसिटी (अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा १९८९)" अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा. ही हत्या असल्याने खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. घटनास्थळी हजर असलेला मित्र 'गजानन राऊत' याला गाडीत येण्यास मज्जाव करून एकट्या 'अरविंद बनसोड'ला हॉस्पिटल घेऊन गेले. याबाबत पोलिसांनी सखोल चौकशी करावी. हॉस्पिटलमध्ये नेताना गाडीत नेमका काय प्रकार घडला, याचा ही तपास करण्यात यावा. आरोपी मिथिलेश उमरकर आणि  मारहाण करणाऱ्या इतर लोकांवरही सहआरोपी म्हणून कारवाई करावी. मृत अरविंद यांच्या सोबतीला असलेला मित्र 'गजानन राऊत' प्रत्यक्षदर्शी असल्याने त्याचा जबाब नोंदवण्यात यावा. तो अद्याप घेण्यात आलेला नाही. पीडित कुटुंबीयांना आर्थिक मदत व एका सदस्याला सरकारी नोकरी दिली पाहिजे, तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्यात यावे.आरोपी 'मिथिलेश ऊर्फ मयूर बंडोपंत उमरकर' याचे पंचायत समिती सदस्य पद रद्द करावे. तसेच स्थानिक जलालखेडा पोलीस स्टेशनची भूमिका संशयास्पद असून राजकीय पार्श्वभूमीचा प्रभाव असल्याने सुरुवातीला तक्रार नोंदविण्यास टाळाटाळ केली. आठवडा होऊन देखील संबंधित आरोपींची साधी  विचारपूस व त्यांना अटक न केल्याने संबंधीत वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी. अश्या मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत.या प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी तपास अधिकारी आणि नागपूरचे पोलीस अधीक्षक (SP) यांच्याशी बोलून माहिती घेतली. पोलीस अधीक्षक (SP) यांना सांगण्यात आले आहे की तपास अधिकारी योग्य नसल्याने या प्रकरणाचा तपास दुसऱ्या चौकशी अधिकाऱ्याकडे देण्यात यावा, या मागणीला पोलीस अधीक्षक (SP) यांनी होकार दिला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...