मंगळवार, ५ मे, २०२०

मुंबई आणि पुणे मंडळात बरे झालेल्या रुग्णांची संख्या सर्वाधिक

राज्यात एकाच दिवशी ३५० कोरोना बाधीतांना घरी सोडले

आरोग्ययंत्रणेच्या प्रयत्नांना यश; नातेवाईकांना दिलासा



मुंबई,प्रतिनिधी: कोरोनाचे रुग्ण वाढत असताना काल दिवसभरात राज्यातील ३५० रुग्णांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत राज्यात एवढ्या मोठ्या संख्येने एकाच दिवशी रुग्णांना घरी सोडण्याची ही पहिलीच वेळ असून त्यामुळे उपचार करणाऱ्या आरोग्य यंत्रणेसोबत रुग्णांच्या नातेवईकांनाही दिलासा आणि धीर मिळाला आहे. राज्यात सर्वाधिक मुंबई मंडळात २२८ रुग्ण काल घरी गेले. त्यापाठोपाठ पुणे मंडळात ११० रुग्णांना पाठविण्यात आले, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
कालपर्यंत राज्यात एकूण २४६५ कोरोना बाधीत रुग्ण बरे झाले आहेत. रुग्णांवर प्रभावी उपचार होत असल्याने बरे होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. राज्यात कोरोना चाचण्यांसाठी प्रयोगशाळांची संख्या वाढवल्यानेही चाचण्या मोठ्याप्रमाणावर होऊन रुग्णांचे निदान वेळेत होत आहे.
राज्यात ९ मार्चला पहिले रुग्ण आढळून आल्यानंतर २३ मार्चला पहिल्यांदा पुणे येथील रुग्णांना घरी सोडण्यात आले त्यानंतर दररोज राज्यात कोरोना बाधीत रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. काल सोमवारी पहिल्यांदाच ३५० रुग्णांना घरी सोडले. राज्यातील ही आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे. त्यामध्ये मुंबई महापालिका क्षेत्रातील १६५, ठाणे ३, ठाणे मनपा ११, नवी मुंबई मनपा १४, कल्याण डोंबिवली मनपा ७, वसई-विरार मनपा २३, रायगड ३ तर पनवेल मनपा येथील २ असे मुंबई मंडळात एकूण २२८ रुग्णांना घरी सोडण्यात आले. पुणे मनपा ७२, पिंपरी-चिंचवड मनपा १४, सोलापूर मनपा २२ तर सातारा येथील २ असे पुणे मंडळात एकूण ११० रुग्णांना घरी सोडले. अमरावती मनपा १, बुलढाणा येथे १ तर नागपूर मनपा क्षेत्रात १० रुग्णांना घरी सोडण्यात आले.
सध्या राज्यात एकूण प्रयोगशाळा असून त्यापैकी २५ शासकीय आणि २० खासगी प्रयोगशळा आहेत. दररोज त्यांच्या माध्यमातून सात हजारपेक्षा जास्त चाचण्यांची क्षमता आहे. कालपर्यंत राज्यात पावणे दोन लाख नमुन्यांपैकी १ लाख ६२ हजार नमुने निगेटिव्ह आले आहेत, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. 


आर्थिक आणिबाणी  लागू करताना सहा महिन्याचे नियोजन जाहीर करावे - वंचित बहुजन आघाडी.



पुणे,प्रतिनिधी - केंद्र सरकारच्या पावलावर पाऊल ठेवत कोरोनाचे संकट वाढल्याने राज्य सरकारने राज्यात आर्थिक आणिबाणी लागू केली असून आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, मदत पुर्नवसन, अन्न पुरवठा खात्यांना प्राधान्यक्रम दिला आहे. असे असले तरी या मध्ये पोलीस दलासोबतच अत्यावश्यक सेवेतील सर्व विभागांना प्राध्यान्य देणे गरजेचे असून प्रत्येक विभागाला ३३ टक्के इतकीच रक्कम दिली जाणार आहे. त्यामुळे समर्पित होणा-या ६७ टक्के निधीचे पुढील सहा महिन्याचे नियोजन आणि संघटीत - असंघटीत कामगार, शेतकरी,शेतमजूर व बेरोजगार यांच्याबाबतीत ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याची मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता राजेंद्र पातोडे यांनी केली आहे.
     आरोग्य विभाग सोडल्यास कुठल्याही खात्याला बांधकाम न करण्याचे आदेश दिले आहेत. शिवाय शक्य तिथे आर्थिक तडजोड, काटकसर करण्याच्या सूचना अर्थ विभागाने दिल्या आहेत. त्याचा सर्वात मोठा फटका नव्या नोकरभरतीला बसणार आहे. फडणवीसांच्या काळात रखडलेली ७२ हजार जागांची नोकर भरती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र कोरोनामुळे  कुठल्याही प्रकारची नोकरभरती न करण्याचे आदेश अर्थ विभागाने दिले आहेत. परंतु आरोग्य, पोलीस विभागातील भरती थांबविली जाऊ नये. तसेच विविध योजना स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  त्यामुळे नवीन कामांचे प्रस्तावही सादर करता येणार नाही. प्रत्येक विभागाला ३३ टक्के इतकीच रक्कम दिली जाणार आहे. आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, मदत पुर्नवसन, अन्न पुरवठा या खात्यांना प्राधान्याने निधी दिला जाणार आहे. या विभागा बरोबरच अत्यावश्यक सेवेतील सर्व विभागांना देखील या मध्ये समाविष्ट करणे गरजेचे असल्याचे पातोडे यांनी सांगितले.           
              राज्यात पीपीई किट, एन ९५ मास्क व थ्री लेयर मास्क तसेच सॅनिटायझर पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही. शासकीय कर्मचा-याचे वेतन अद्यापही  थकीत असून जून मध्ये वेतन मिळेल की नाही याची शाश्वती नाही. आर्थिक वर्षात सर्व नव्या योजनांवर बंदी आणण्यात आली आहे.आरोग्य खाते सोडल्यास इतर  कुठल्याही खात्याला नवीन बांधकाम तसेच कुठल्याही कर्मचाऱ्याची बदली न करण्याचे आदेश देण्यात आले आहे. अनेक योजना पुढे ढकलण्या बरोबरच त्या योजना आपल्या स्तरावर स्थगित करणे तसेच या योजना रद्द करण्यासाठी ३१  मे पर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे. अशा प्रकारे राज्यावर आर्थिक आणिबाणी लावण्यात आली आहे. शासकीय तिजोरीची तूट भरणे आवश्यक आहे. मात्र समर्पित होणाऱ्या ६७ टक्के निधीचे नियोजन शासनाने सांगितलेले नाही. हा आकडा सरकारी महसुल वसुलीच्या किती तरी अधिक आहे. त्यामुळे त्याचे नियोजन तातडीने जाहीर होणे गरजेचे आहे. 
             शेतक-याची रब्बी पिके घरात पडून आहेत. त्याची खरेदी शासनाने करून घेतली पाहिजे. सोबतच शेतक-यांना खरीप पिकांच्या पेरणी आणि मशागती करीता बियाणे, खते तसेच दहा हजार रुपये रोख दिले पाहिजे. बाजार समित्यांच्या खरीप पिकातून हा खर्च वसूल करता येईल.रोजगार हमी योजनेची कामे बंद आहेत ते शारीरिक अंतर राखून तातडीने सुरु करण्यात यावी व शहरी भागात देखील १०० दिवस रोजगार देण्याची योजना राबविण्यात यावी, अशी मागणी देखील वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता राजेंद्र पातोडे यांनी केली आहे. जनतेवर नुसते निर्बंध लादण्यात येऊ नये तर त्या सोबत माणसे जगली पाहिजे याची उपाययोजना देखील करावी अशी अपेक्षा वंचितने व्यक्त केली आहे.  


थोटे पिंपळगाव प्रकरणी कठोर शिक्षा करून साळवे परिवाराला तात्काळ संरक्षण द्या- दीपक डोके                                   



जालना (प्रतीनिधी) :- भोकरदन तालुक्यातील थोटे पिंपळगाव येथील नितीन साळवे या तरुणाला संlशयावरून गावातील गावगुंडांनी किडन्याप केले व सतत चार दिवस मारहाण केली तसेच हत्या करण्याचा कट सुध्दा करण्यात आला परंतु तो वाचला या प्रकरणी साळवे परिवाराला जिवे मारण्याच्या धमक्या केस मागे घेण्यासाठी दबाव आणला जात आहे तरी सदरील प्रकरणी  गावगुंडांना कठोर शिक्षा करून व साळवे परिवाराला तात्काळ संरक्षण देण्यात यावे नसता वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकारी यांना ई-मेल द्वारे  निवेदनात वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी दीपक डोके, अँड.अशोक खरात, अकबर इनामदार, विष्णु खरात, दिपक घोरपडे, विनोद दांडगे, अँड.कैलास रत्नपारखे, प्रदीप जोगदंडे, अँड.हर्षवर्धन प्रधान,शेख लालाभाई आदींनी दिला आहे.

सोमवार, ४ मे, २०२०

लाॅकडाऊनच्या काळात अवैधरित्या मद्य विक्री करणाऱ्या परमीटरूम चालकांचे परवाने रद्द करा

अखिल भारतीय सेनेच्या नंदा पवार यांची मागणी.


जालना,प्रतिनिधी:-
 कोवीड १९या महामारीचा फैलाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लाॅकडाऊनच्या काळात अवैधरित्या मद्य विक्री व वाहतूक करणाऱ्या परमीटरूम मालकांचे परवाने रद्द करण्यात यावेत, अशी मागणी अखिल भारतीय सेनेच्या जालना महिला शहराध्यक्ष नंदा पवार यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.


  आज(ता.४) नंदा पवार यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे उपरोक्त संदर्भात एक निवेदन दिले आहे.या निवेदनात म्हटले आहे की,कोवीड१९या महामारीचा  फैलाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लाॅकडाऊनच्या काळात जालना शहरात आणि परिसरात परमीटरूम मालक -चालक अवैधरित्या मद्य विक्री करीत आहेत, शिवाय मद्यची अवैधरित्या वाहतूक करीत आहेत.लाॅकडाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तू ,औषधी वगळता इतर सर्व आस्थापना बंद आहेत.मद्य विक्री तर बेमुदत बंद आहे.अशा परिस्थितीत जालना शहरातील आणि परिसरातील परमीटरूम मालक-चालक अवैधरित्या मद्य विक्री करीत आहेत.गेल्या आठवड्यात स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने यासंदर्भात परमीटरूम मालक-चालक यांच्याविरोधात कारवाई केली आहे.वास्तविक पाहता अवैधरित्या मद्य विक्री रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग कार्यरत आहे.मात्र या विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.अवैधरित्या मद्य विक्री करणाऱ्या परमीटरूम मालक-चालक आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे लागेबांधे आहे,हे यावरून सिद्ध होते.अवैधरित्या मद्य विक्री रोखण्याऐवजी राज्य उत्पादन शुल्क विभागाने गावठी दारूच्या अड्डे उध्दवस्त केले.जालना शहरात लाॅकडाऊनच्या काळात परमीट रूम फोडून तेथून मद्याचे बाॅक्स चोरीस गेल्याच्या तक्रारी पोलिसांकडे दाखल करण्यात आलेल्या आहेत.हा परमीटरूम मालक-चालक यांनी केलेला बेबनाव आहे,मद्याच्या बाटलीवरील पॅकींग नंबरची चौकशी केली तर यामागील सत्य बाहेर येईल.जिल्हाधिकाऱ्यांनी याची चौकशी करून अवैधरित्या मद्य विक्री करणाऱ्या परमीटरूम मालक-चालक यांच्याविरोधात कारवाई करावी तसेच त्यांचे परवाने रद्द करून या मंडळींना पाठीशी घालणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची  चौकशी करावी, अशी मागणीही नंदा पवार यांनी या निवेदनात केली आहे.


जिल्ह्यातुन परराज्यात, परजिल्ह्यात जाण्या  व येण्यासाठी आजपर्यंत 7 हजार 78 अर्ज प्राप्त
कागदपत्रांची तपासणी करुन निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरु
जालना,प्रतिनिधी :- जालना जिल्ह्यातुन इतर राज्यात जाण्यासाठी आजपर्यंत ऑनलाईन पद्धतीने 5 हजार 369 तर जालना जिल्ह्यातुन महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यात जाण्यासाठी 1 हजार 709 असे एकुण 7 हजार 78 अर्ज प्राप्त झाले असुन अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांची तपासणी करुन पुढील निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आली आहे. जिल्ह्यातील ज्या नागरिकानी ऑनलाईन पद्धतीने https:jalna.gov.in/mr/tofrmjalna/ या लिंकवर इतर राज्यात, जिल्ह्यात जाण्यासाठी अर्ज केले होते.  त्यांचे पास संबंधित तहसिल कार्यालयाकडे वर्ग केले असुन अर्जदारांनी संबंधित तहसिल कार्यालयाशी संपर्क साधुन पास हस्तगत करुन घ्यावेत.  यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क करुन नये.  तसेच जालना जिल्ह्यातुन इतर राज्यात, जिल्ह्यात जाण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून https://jalna.gov.in/tofromjalna/ तसेच पोलीस विभागाच्या प्रवासाचा परवाना मिळण्यासाठी https://covid19.mhpolice.in/ या लिंकवर माहिती भरावी. वरील दोनही प्रकारच्या परवानग्या बाहेर राज्यात, जिल्ह्यात जाण्यासाठी आवश्यक आहेत.  या परवानग्या केवळ ऑनलाईन पद्धतीने दिल्या जातील.  यासाठी कोणीही ऑफलाईन पद्धतीने अर्ज करु नयेत.  तसेच जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी नोंदणी करु नये अन्यथा संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असेही प्रशासनामार्फत कळविण्यात आले आहे. 
  जिल्ह्यात एकुण 1121 व्यक्ती संशयित असुन सध्या रुग्णालयात 56 व्यक्ती भरती आहेत तर एकुण भरती केलेल्या व्यक्तींची संख्या 765 एवढी आहे. दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या 32 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या व्यक्तींची संख्या 1073 एवढी आहे.  दैनिक पॉझिटीव्ह नमुने -00 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या 08 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या 1026, रिजेक्टेड नमुने-04, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या 221, एकुण प्रलंबित नमुने-35 तर एकुण 709 व्यक्तींना डिस्जार्च देण्यात आला आहे. 
14 दिवस पाठपुरावा केलेल्या दैनिक व्यक्तींची संख्या 19, 14 दिवस पाठपुरावा झालेल्या एकुण व्यक्तींची संख्या 421 एवढी आहे. आज अलगीकरण केलेल्यांची संख्या 15, सध्या अलगीकरण  केलेल्या व्यक्ती -275, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयित-17, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्यांची संख्या 56, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेल्यांची संख्या 19, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या 230 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या शुन्य एवढी आहे.   
कोरोनाविषाणुचा प्रादुर्भाव वाढु नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात एकुण 275 व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले असुन यामध्ये संत रामदास मुलांचे शासकीय वसतीगृह, जालना – 48,डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह-41, मुलींचे शासकीय निवासी वसतीगृह-26, मोतीबाग येथील शासकीय मुलींचे वसतीगृह-24, पोलीस प्रशिक्षण केंद्र-119, परतुर-08, जाफ्राबाद-6 तर भोकरदन येथे 03 व्यक्तींचे अलगीकरण करण्यात आले आहे. लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत असुन आतापर्यंत 469 व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात येऊन 80 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. 540 वाहने जप्त, मुद्देमाल रक्कम 26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली 2 लाख 59 हजार 400 असा एकुण तर 2 लाख 86 हजार 208 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
जैन संघटना सामाजिक कार्यात अग्रेसर असते भाजपाचे ज्ञानेश्वर शेजुळ 

सिंधीकाळेगाव (प्रतिनिधी) :- भारतीय जैन संघटना सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असल्याचे गौरवोउद्गार जालना तालुका भाजपाचे मा.अध्यक्ष तथा जालना तालुका रो.ह.यो,चे अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर शेजुळ यांनी आरोग्य तपासणी दरम्यान काढले आहे.भारतीय जैन संघटनेच्यावतीने नैसर्गिक आपत्ती,भुकंप,दुष्काळ व ईतर संकटाच्यावेळी सर्वसामान्य जनतेच्या सुख दुःखात धाऊन जाऊन आर्थिक मदत करण्याचे काम अविरत चालु असल्याचे श्री ज्ञानेश्वर शेजुळ यांनी म्हटले आहे.व या संघटनेच्यावतीने सध्या सेवली सर्कलमध्ये .डाॅक्टर आपल्यादारी.हा ऊपक्रम राबविण्यात येत आहे.काल भारतीय जैन संघटना,फोर्स मोटार्स व डाॅक्टर युनियनच्यावतीने जालना तालुक्यातील मौजे सोनदेव येथे कोरोना विषाणुवर मात करण्यासाठी गावात आरोग्य तपासणी करण्यात आली. गावातील अनेक रुग्णांना तपासण्यात आले व काहींना योग्य प्रमाणात गोळ्या व औषधी वाटप करण्यात आली.या वैद्यकिय पथकामध्ये सेवली येथील जैन संघटनेचे अध्यक्ष श्री दिनेश शेठ राका, जालना तालुका भा.ज.पा.चे मा.अध्यक्ष व रो.ह.यो.चे अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर शेजुळ,सेवली प्रा.आ.केंद्राच्या वैद्यकिय अधिकारी ,मॅडम,डाॅ.मान्टे साहेब, डाॅ.नागरे साहेब,डाॅ.जोगड साहेब व डाॅ.किंगरे साहेब यांचेसह अनेकांची उपस्थिती होती.गावात तपासणी दरम्यान सामाजिक अंतर व शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात आले.
लॉकडाऊनमुळे अडकलेल्या परप्रांतीयांची वाट खडतरच
आरोग्य प्रमाणपत्रासाठी नांदेडमध्ये रांगा
आॅनलाईन फॉम भरताना अडचणी



नांदेड (भगवान कांबळे) :-  इतर राज्यातील तसेच इतर जिल्हयातील नागरीक, विद्यार्थी नांदेड जिल्हयात मोठ्या प्रमाणात लॉकडाऊनमुळे अडकले आहेत़ या नागरिकांना त्यांच्या मुळगावी परतण्यासाठी शासनाने परवानगी दिली असली तरी यासाठीची प्रक्रिया किचकट असल्याने या नागरिकांची वाट खडतरच आहे़ सोमवारी आरोग्य तपासणीसाठी या नागरिकांनी श्री गुरुगोविंदसिंघजी शासकीय रुग्णालयात मोठी गर्दी केली होती़
कोरोना रोगाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरु असल्याने अनेकजण बाहेरील जिल्ह्यातील तसेच बाहेरील राज्यातील नांदेडमध्ये अडकलेले आहेत़  अशा नागरिकांना आप-आपल्या गावी जाण्यासाठी राज्य शासनामार्फत नोंदणीसाठी ँhttps://covid19.mhpolice.in हे  संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले आहे़ या संकेतस्थळावर परीपुर्ण माहितीसह छायाचित्र व इतर आवश्यक कागदपत्रांची प्रत अपलोड करून माहिती नोंदणी केल्यानंतर संबंधीत अर्जदारास आॅनलाइन टोकण क्रमांक प्राप्त होणार आहे़ हा आॅनलाईन टोकन क्रमांक त्याच संकेतस्थळावरून डाऊनलोड पास या आॅपशनवर आपला टोकण क्रमांक नोंदवून पासची प्रिंट काढुन घ्यायची आहे़
या पास नोंदणीसाठी नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकाकडून तपासणी प्रमाणपत्र घेणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. त्यामुळेच सोमवारी शहरातील श्री गुरुगोविंदसिंघजी शासकीय रुग्णालयात आरोग्य तपासणीसाठी नागरिकांनी सकाळपासूनच रांगा लावल्या होत्या़ ही रांग या रुग्णालयापासून वजीराबाद चौरस्तापर्यंत गेली होती़ परंतू सकाळी १० वाजेपर्यंतच तपासणी केल्यानंतर राहिलेल्या विद्यार्थी तसेच परप्रांतीयांना उद्या या म्हणून परत पाठविण्यात आले़ यामुळे अनेकांची निराशा झाली़ रांगा लावून ही तपासणी करुन घ्यायची आणि त्यानंतर पुन्हा आॅनलाईन अर्ज दाखल करण्यासाठीचे आव्हानही या नागरिकांसमोर उभे आहे़

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...