रेल्वे रुळावर थकून झोपलेली १४ मजूर मालवाहू रेल्वेखाली चिरडली.
या दुर्दैवी अपघाताला जबाबदार कोण प्रशासन की संभाव्य परिस्थिती ?
औरंगाबाद, प्रतिनिधी : औरंगाबाद तालुक्यातील सटाणा शिवारात ( करमाड डीएमआयसी परिसर) रेल्वे रुळावर थकून झोपलेली १४ मजूर मालवाहू रेल्वेखाली चिरडली गेली. हा भीषण अपघात दिनांक 8 मे शुक्रवारी पहाटे ५.१५ वाजता घडला. यात २ मजूर गंभीर जखमी असून तिघे जीव वाचविण्यात यशस्वी झाले आहेत. सर्व मजूर मध्य प्रदेश येथील असून ते जालना येथे लॉकडाऊन मध्ये अडकले होते. घराच्या ओढीने सर्व मजूर पायी रेल्वे रुळाच्या मार्गे निघाले होते.याबाबत अधिक माहिती अशी की, जालना येथील एसआरजे कंपनीत मध्य प्रदेश येथील १९ मजूर काम करतात. कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे ही मजूर जालना येथे अडकली गेली. दरम्यान, शासनाने परप्रांतीय मजुरांना घरी जाण्यासाठी विशेष रेल्वे सुरू केल्या आहेत अशी माहिती या मजूरांना मिळाली. तसेच भुसावळ येथून मध्य प्रदेशला रेल्वे जाणार असल्याची माहिती या १९ मजुरांना मिळाली असता पोलिसांचा ससेमिरा चुकविण्यासाठी ते रेल्वे रुळाच्या मार्गे औरंगाबादच्या दिशेने चालत निघाले. सटाणा परिसरात रात्री थकून हे मजूर रेल्वे रुळावर झोपले. पहाटे अचानक एक मालवाहू रेल्वे त्यांच्या दिशेने आली . काही कळायच्या आत १४ मजूर रेल्वे खाली चिरडले गेले तर दोघे गंभीर जखमी असून तिघे प्राण वाचविण्यात यशस्वी झाले आहेत.जालना येथील स्टील कंपनीचे १९ कामगार भुसावळला जाण्यासाठी रेल्वेरुळावरून पायी निघाले होते. सटाना परिसरात ते रुळावर झोपले असतांना मालगाडीने त्यांना चिरडले. यात १४ जण ठार तर २ कामगार जखमी झाले. सर्वांचे मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद येथे पाठवण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा