कोरोनाची साथ संपेपर्यंत बँकांनी सक्तीने वसुली
करू नये - दिपक डोके
जालना (प्रतीनिधी) :-कोरोना विषाणूचीसाथ आटोक्यात येईपर्यंत जालना जिल्ह्यातील छोट्या व्यापाऱ्यांचे उद्योग-व्यवसाय सुरळीत होईपर्यंत बँकांनी छोट्या कर्जदारांकडून सक्तीने वसुली करू नये आणि या कालावधीसाठी व्याज आणि न भरलेल्या हप्त्यांवर दंड आकारू नयेत, असे आदेश सरकारने सर्व बँकांना द्यावेत अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी दिपक डोके यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे ई-मेल व्दारे केली आहे.
कोरोनाची साथ पसरू नये म्हणून २२ मार्च पासून १४ एप्रिल पर्यंत महाराष्ट्रसह देशभर लाँक डाऊनमुळे सामान्य नागरिकांसह सर्वांचाच रोजगार,व्यापार, उद्योग व्यवसाय व सर्वच बाजारपेठा बंद आहेत, मात्र यामुळे सामान्य नागरिकांची आर्थिक कोंडी होत आहे. छोटे व्यापारी, वाहन चालक, गृहिणी, यांच्यासह असंख्य छोट्या उद्योजकांची आर्थिक कोंडी झाली आहे. अशा परिस्थितीत या छोट्या दुकानदारांनी, गृहिणींनी बँका,पतपेढ्या अथवा मायक्रोफायनान्स कंपन्यांकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते कसे फेडावे हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.
वंचित बहुजन आघाडीच्यावतीने आम्ही केंद्र आणि राज्य शासनाकडे अशी मागणी करतो की, कोरोना विषाणूची साथ आटोक्यात येईपर्यंत आणि छोट्या व्यापाऱ्यांचे उद्योग-व्यवसाय सुरळीत होईपर्यंत बँकांनी छोट्या कर्जदारांकडून सक्तीने वसुली करू नये तसेच या कालावधीसाठी व्याज आणि न भरलेल्या हप्त्यांवर दंड आकारू नयेत, असे आदेश सरकारने सर्व बँकांना द्यावेत. तसेच खाजगी सावकारांना सुद्धा सक्तीने वसुली न करण्याचे आदेश द्यावेत जर खाजगी सावकारांकडून कर्जदारांना त्रास दिला जात असेल तर पोलिसांना कारवाईचे आदेश द्यावेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव झालेल्या देशांमध्ये आरोग्य व्यवस्थेसोबतच अर्थव्यवस्थेवरही विपरीत परिणाम होत आहेत. कोरोनाचा सर्वाधिक फटका हा छोट्या व्यावसायिकांना बसला असून त्यांची अर्थव्यवस्था कोलमडून पडली आहे. अशा वेळी बँकांनी सक्तीची वसुली करु नये असे आदेश द्यावेत अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी दिपक डोके यांनी केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा