जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांची पत्रकार परिषद संपन्न
कोरोनाला जिल्ह्यातुन हद्दपार करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करा
जालना,ब्युरोचीफ :- जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी आज कोरोना विषाणुच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पत्रकारांशी संवाद साधत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनामार्फत करण्यात आलेल्या उपायोजनांची माहिती देत कोरोनाला जालना जिल्ह्यातुन हद्दपार करण्यासाठी जनतेने प्रशासनामार्फत देण्यात आलेल्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे, अनावश्यक घराबाहेर जाणे टाळावे, मास्क, सॅनिटायजरचा सातत्याने वापर करण्याबरोबर सामाजिक अंतराचे पालन करुन प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.
यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा, पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, उपजिल्हाधिकारी (रोहयो) रवींद्र परळीकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एम.के. राठोड, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष कडले आदींची उपस्थिती होती.
पत्रकार परिषदेमधील मुद्दे
· जालना जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधितांची एकुण संख्या 504 एवढी झाली असुन आजपर्यंत 317 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. 13 रुग्णांचा मृत्यू झाला असुन आजघडीला जिल्ह्यात 174 रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत.
· केवळ अर्ध्या तासामध्ये कोरोनाविषाणुने व्यक्ती बाधित आहे किंवा नाही हा अहवाल देणाऱ्या अँटीजेन टेस्टसाठी 50 हजार किटसची मागणी नोंदविण्यात आली आहे.
· जिल्ह्यामध्ये अँटीबॉडी टेस्टसाठी 100 किटस उपलब्ध असुन या माध्यमातुन शास्त्रोक्त पद्धतीने व्यक्तींची तपासणी करण्यात येणार आहे.
· नवीन जालन्यामध्ये कोरोनाबाधितांची संख्या अधिक असुन त्यामानाने जुन्या जालन्यामध्ये संख्या कमी आहे. विनाकारण नागरिक नवीन जालना व जुन्या जालनमध्ये गर्दी करत असल्यामुळे होणारी गर्दी टाळण्यासाठी जुन्या व नवीन जालन्याला जोडणारे पुल काही काळासाठी बंद करण्यात येत असुन या पुलावरुन केवळ रुग्णवाहिकेला वाहतुकीची परवानगी असणार आहे.
· पालकमंत्री राजेश टोपे यांच्या पुढाकाराने जालना जिल्ह्यात आरटीपीसीआर लॅब उभारणीस मंजुरी दिली असुन या लॅबचे काम युद्ध पातळीवर करण्यात येत आहे. येत्या काही दिवसात लॅबचे काम पुर्ण होऊन सुसज्ज व अद्यावत अशी लॅब सुरु करण्याचे नियोजन करण्यात आले असुन या लॅबसाठी लागणारे तांत्रिक मनुष्यबळही उपलब्ध करुन देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
· कोरोनाबाधितांवर उपचार करणारे डॉक्टर्स, आरोग्य सेविका यांचे मनोबल कायम रहावे यासाठी मानसोपचार तज्ज्ञांमार्फत या कर्मचाऱ्यांचे समुपदेश करण्यावर भर देण्यात येत आहे.
· पालकमंत्री राजेश टोपे यांच्या प्रयत्नातुन जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी 29 दिवसामध्ये कोव्हीड हॉस्पीटलची उभारणी करण्यात आली असुन या ठिकाणी 40 व्हेंटीलेटर बरोबरच सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्या आल्या आहेत. पुरेशा प्रमाणात वैद्यकीय अधिकारी, कर्मचारीही उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.
· ग्रामीण भागात आरोग्य सेवा बळकटीकरणासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
· 60 वर्षापेक्षा अधिक वय असणाऱ्या व मधुमेह, ऱ्हदयरोग, रक्तदाब यासारखे आजार असणाऱ्या व्यक्तींचे घरोघरी जाऊन सर्व्हेक्षण करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. यामध्ये कोरोना संक्रमितांच्या संपर्कात आलेला अथवा कंन्टेन्टमेंट झोनमध्ये असतील अशा व्यक्तींना तातडीने उपचार करण्यात येणार आहेत.
· कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी प्रत्येकाने सामाजिक अंतराचे पालन करणे, मास्कचा वापर करणे, सॅनिटायजरचा वापर अथवा साबणाने वारंवार हात धुणे या बाबींची सवय अंगिकारावी.
· समाजातील प्रत्येक नागरिकाने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी पौष्टीक आहाराबरोबर प्राणायाम, व्यायाम सारख्या बाबींचा अवलंब करण्याबरोबरच मानसिक स्वास्थ टिकुन राहण्यासाठीही प्रयत्न करण्याची गरज.
· पल्स ऑक्सीमीटरच्या माध्यमातुन एसपीओ2, ब्लड सॅच्युरेशनचे प्रमाण कळत असल्याने प्रत्येक नागरिक घरातल्या घरात तपासणी करु शकतो. 94 पेक्षा लेव्हल असेल व आपल्याला सर्दी, खोकला किंवा ताप यासारखी लक्षणे असल्यास तातडीने जवळच्या रुग्णालयास संपर्क साधावा.
· सर्व्हेक्षणासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना आपली खरी माहिती द्या. जेणेकरुन आपल्याला काही त्रास असल्यास त्यावर तातडीने उपचार करणे शक्य होईल.
· जालना जिल्हयात एकुण 119 कंन्टेन्टमेंट झोन होते. त्यापैकी 37 झोन ॲक्टीव्ह असुन या झोनमधुन एकही व्यक्ती बाहेर जाणार नाही अथवा या झोनमध्ये येणार नाही याची खबरदारी घेण्यात येत आहे.
· प्रत्येक कंन्टेन्टमेंट झोनमध्ये 24 तास पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आलेला असुन या ठिकाणी पोलीस विभागाचे अधिकारी व कर्मचारी बारीक लक्ष ठेऊन आहेत.
· सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर न करणे तसेच सामाजिक अंतर न पाळणाऱ्या व्यक्तींवर पोलीस तसेच नगर पालिकेमार्फत कारवाई करण्यात येत असुन आतापर्यंत मास्कचा वापर न करणाऱ्या व्यक्तींकडून १२ लक्ष रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे. तसेच सामाजिक अंतर न पाळणाऱ्या 309 व्यक्तींवर तर दुकानांमध्ये सामाजिक अंतराचे पालन न करणाऱ्या 263 व्यक्तींवर कारवाई करण्यात आली आहे.
· जिल्ह्यामध्ये ग्रामीण व शहरी भागामध्ये हाय व लोरिस्क सहवासितांचा अचुकपणे शोध घेण्यात येत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा